अप्रतिम निसर्गसौंदर्य म्हणजे काय हे आज जाणवले. एक क्षण मनात येऊन गेले स्वर्ग म्हणजे बहुतेक असेच काहीतरी असावे. उटी ते कोडाई कनालचा प्रवास करताना जे सौंदर्य अनुभवले आहे ते शब्दांत लिहीणे कठीण आहे. मला कधीच प्रवास करताना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची घाई नसते. त्यापेक्षा प्रवासाचा आनंद घेणे मला जास्त आवडते. त्यामुळे आज उटी ते कोडाई या प्रवासाचा पुरेपूर आनंद अनुभवता आला. हा प्रवास जवळजवळ 250 कि. मी. आहे. पण त्यात शेवटचे 60 कि. मी. पूर्णपणे घाट आहे. खरतर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांग असल्याने घाटातून प्रवास करण्याची सवय आपल्याला असतेच. पण इथले घाट खूप वेगळे वाटले. सह्याद्रीच्या सौंदर्यात एक रांगडे पणा जाणवतो. पण उटीची निलगीरी पर्वत रांग आणि कोडाई ची पळनी पर्वत रांग यात एक वेगळी नजाकत जाणवली. सगळ्यात महत्त्वाचे हे पर्वत खूप हिरवेगार आहेत. येथील रहिवाशांना विचारले असता असे समजले की या भागात मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने वगळता इतर वेळी अधूनमधून पाऊस पडतोच. त्यामुळे ही पर्वत रांग कायमच हिरवीगार असते असे म्हणता येईल. या वर्षी तर मे महिन्यातही पाऊस पडला. या पर्वतांची ऊंची देखील जास्त आहे. पण घाट चढताना ही ऊंची जाणवू न देण्याची खबरदारी पण हे पर्वतच घेतात. हे पर्वत अगदी अलगद पणे त्यांच्या कुशीत घेऊन आपल्याला वर पर्यंत आणून पोहचवतात. या घाटातील सौंदर्य आपल्याला मोहित करून टाकते. मधूनच येणारा जोरदार पाऊस आणि क्षणात पाऊस थांबून पडणारे ऊन हे या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. आज तर या ऊन - पावसाच्या खेळात आम्हाला सुंदर इंद्रधनुष्य बघायला मिळाले. मी या पूर्वी एवढे मोठे इंद्रधनुष्य कधीच बघितले नव्हते. अगदी एखाद्या चित्रकाराने त्याच्या चित्रात रंगविल्याप्रमाणे ते इंद्रधनुष्य आपले सगळे रंग चमकवत दिमाखात पसरले होते.
खरोखरच आपण एका वेगळ्याच जगात आहोत असे वाटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा