सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोनाची सुट्टी



परवा सकाळी माझ्या एका मैत्रिणीने विचारलं, अग आता मुलांना शाळेला सुट्टी दिली आहे, क्लासेस बंद, सर्व अॅक्टीव्हिटीज बंद, त्यामुळे माझ्या मुलाला गुंतवून ठेवण्यासाठी काय करू ते सांग.

बहुतेक तरी हा प्रश्न सध्या बऱ्याच पालकांना पडलेला असणार. कारण नेहमीची सुट्टी आणि आत्ताची सुट्टी यात खूप फरक आहे. या सुट्टीमध्ये मुलांना कुठेही बाहेर पाठवता येत नाही, मुला-मुलांना एकत्र खेळता येत नाही. त्यामुळे ही मुलं, जी लहान आहेत ती घरी आई वडिलांच्या मागे भुणभुण करतात. आणि जरा मोठी मुलं असतील तर पालकांचा सूर असा असतो की, मुलं दिवसभर काहीही करत नाहीत, फक्त कोणत्या न कोणत्या स्क्रीन (मोबाईल, लॅपटॉप, टी.व्ही.) समोर तासन तास बसलेली असतात.

आपण मुलांना सारखं अरे, मोबाईल खेळू नको, टी. व्ही. बघू नको, व्हिडीओ गेम खेळू नको, माझ्या मागे लागू नको, असे नकारात्मक सल्ले देत असतो, अर्थात काहीतरी कर असं पण सांगतो, पण नक्की काय हे मात्र सांगत नाही किंवा सांगितलं तरी बऱ्याचवेळा आपल्या मते जे चांगलं तेच सांगतो, त्यांना काय आवडेल किंवा attractive वाटेल याचा विचार कदाचित थोडा कमी पडतो.
जरा थोडसं आपल्या बालपणात डोकावून बघूया का? आपण लहान असताना कुठे होते मोबाईल, व्हिडिओ गेम, किंवा आत्तासारखे टी.व्ही. वरती सततचे कार्यक्रम. पण तरीही आपलं बालपण छान गेलंच की! अर्थात इथे एक सावधगिरी बाळगावी लागेल, ती म्हणजे, तुम्ही जर हे वक्तव्य समजा तुमच्या मुलांसमोर केलत तर खेळ सुरु व्हायच्या आधीच संपेल बर का. आपण जे काही वर म्हटलं ते फक्त आपल्या उजळणीसाठी. बरं, या सर्वांबरोबर अजून एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या पालकांकडून मिळाली ती म्हणजे त्यांचा ‘छान’ वेळ. ‘छान’ हे खूप महत्वाचं आहे. आपण सध्या बघितलं तर बरेचसे पालक हे त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना इच्छा असून देखील हा छान वेळ त्यांच्या मुलांना तर नाहीच पण स्वतःला पण देता येत नाही.
त्यामुळे आता ही मिळालेली सुट्टी आहे त्याचा छान उपयोग कसा करता येईल याचा विचार करूयात. आणि त्याचबरोबर या वायरस शी लढण्यासाठी एक सकारात्मक उर्जा आजूबाजूला निर्माण करूया. बघूया बरं काय काय करता येईल ते!

कदाचित, सध्याच्या बऱ्याच मुलांना आपण पालक, लहानपणी सुट्टीत दुपारी बाहेर जायला मिळायचं नाही म्हणून कितीतरी वेगवेगळे बैठे खेळ खेळायचो ते माहितही नसतील. तर त्यांना या खेळांची ओळख करून देऊ. त्यानिमित्ताने आपणही आपलं बालपण परत जगू. आठवत आहेत का काही खेळ? पत्त्यांचे निरनिराळे प्रकार, कॅरम, कानगोष्टी, लपवलेली गोष्ट शोधून काढणे, स्मृती खेळ, शिवाजी म्हणतो, भेंड्या, नावं-गाव-फळ-फुल (सध्याची मुलं याला name, place, animal, thing म्हणतात). आठवायला सुरुवात केली की अजूनही पुष्कळ मिळतील. रोज एक नवीन खेळ शोधून तो एकत्र बसून खेळुयात. कधी पालकांच्या लहानपणीचे तर कधी आपल्या मुलांच्या वेळेस नवीन आलेले खेळ त्यांच्याकडून शिकून घेऊ आणि खेळू. कधी कधी पालकांनी विद्यार्थ्याची भूमिका घेतली की मुलांना आनंद होतो.

आपल्या बऱ्याच घरांमधून सध्या काम करणाऱ्या बायका, घरातील वरची कामे, साफसफाई हे करताना दिसतात. सध्या आपल्या या बायकांना सुद्धा सुट्टी द्यावी लागलेली आहे. मग याचा फायदा कसा करून घेता येईल? आपण आपल्या मुलांची मदत घेऊन ही कामं करू शकतो का? ही साफसफाई करताना काही जुन्या गोष्टी सापडतील, कदाचित. उदाहरणार्थ, जुने फोटो, काही जुनी पत्र (जेव्हा इमेल नव्हते), काही खास जपून ठेवलेल्या गोष्टी, आणि मग या प्रत्येक गोष्टीबरोबर असलेली प्रत्येकाची वेगवेगळी आठवण. या आठवणी एकमेकांना सांगून त्यांना उजाळा देऊया. 
स्वयंपाक घरात नवनवीन पदार्थ मुलांची मदत घेऊन करूया. तो पदार्थ मुलांच्या आवडीचा असेल तर फारच छान.

कधीतरी एकत्र बसून एखादा छान सिनेमा बघुयात. सगळ्यांनी एकत्र बसून आपलं आपलं आवडतं पुस्तक वाचूया आणि जमल्यास वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चा करूया. बघा कितीतरी गोष्टी सुचल्या. सगळ्यांनी मिळून विचार केला तर अजूनही खूप कल्पना सुचतील.

या सगळ्याबरोबरच मुलांना त्यांचा असा वेळ पण देऊया. कारण, आजपर्यंत त्यांना आपले पालक एवढा वेळ आपल्याबरोबर असायची सवय नाही. त्यामुळे अजीर्ण होईल एवढा सहवासही नको. शिवाय मुलं नेहमी म्हणतात ना आम्हाला आमची स्पेस हवी असते. मग ती स्पेस पण देऊया. आणि हो या स्पेस वर आपलं म्हणजे पालकांच्या सूचनांचं अतिक्रमण नको. मुलांवर थोडं विश्वास ठेवायला हवा. त्यामुळे त्यांना थोडसं मोकळं सोडणासुद्धा तितकंच गरजेचं आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी म्हणून जी सुट्टी मिळालेली आहे, ती फक्त टी.व्ही. आणि व्हॉट्सअ अॅप   वर येणाऱ्या बातम्यांमध्ये राहून घरात नकारात्मक वातावरण निर्मिती करण्यापेक्षा घरातील संवाद वाढविण्यासाठी, घरातील सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम करून  घरात सकारात्मक वातावरण निर्मिती करूया. वातावरण सकारात्मक असेल तर भीती आणि चिंता यांचं सावट कमी होण्यास नक्की मदत होते.

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

जाणीव

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्।।

लहानपणी संध्याकाळचा परवचा (श्लोक, पाढे इ.) म्हणताना आणि सकाळी उठल्यावर हा श्लोक सवयीने म्हणत असू. आमच्या पिढीत काही अपवाद सोडले तर आई वडील, आजी आजोबा अशा वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितल की ते करायचं, का करायचं असं विचारायची पद्धत नव्हती आणि टाप ही नव्हती. कदाचित लहानपणी श्लोकाचा अर्थ समजत नसेल, पण पद्धत म्हणून म्हणत असू. जेव्हा कळायला लागल तेव्हा लक्षात आलं की दिवसभर या हातांनी आपण काम करणार आहोत त्याचे दिवसाच्या सुरुवातीलाच आभार मानायचे.

आता विचार केल्यावर जाणवत की आपण आपल्या शरीराला किती गृहीत धरतो. प्रत्येक अवयवांची कामं ठरलेली असतात आणि त्यांनी ती करायचीच असतात, त्याचा विचार तो काय करायचा?

परवा माझ्या सासऱ्यांचे एक मित्र आमच्याकडे आले होते. वय वर्ष 72 पण अजूनही सायकल चालवतात, गड चढायला जातात, दोन वर्षांपूर्वी तर ते everest base camp ला जाऊन आले. पण गेल्या आठवड्यात असाच काहीतरी पराक्रम करताना त्यांचा पाय दुखावला आणि डॉक्टरांनी सांगितलं की पायावर जास्त जोर द्यायचा नाही, त्यामुळे त्यांच्या सर्व पराक्रमांवर बंधन आली. बोलता बोलता ते म्हणाले की माझे पाय हे माझे गुलाम आहेत असंच मी त्यांना वागवत होतो. पण आता जेव्हा पाय दुखावल्याने सर्व बंधन आली त्यामुळे मी त्यांची काळजी घ्यायला लागलो.

खरंच आहे, आपल्या अवयवांची आपण काळजी तर घेतलीच पाहिजे पण त्याचबरोबर ते ज्या प्रकारे आपल्याला साथ देत असतात त्याची जाणीव ठेवून त्यांचे आभार मानायला पाहिजेत.

कोणत्याही क्षेत्रात उदाहरणार्थ खेळ, शिक्षण, कला, आपल्याला यश मिळाले की आपण त्याचे श्रेय आपण आपल्या कुटुंबियांना, गुरूंना देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. म्हणजे बघा हं एखाद्या खेळाडूने त्याच्या स्पर्धेमध्ये अपेक्षित यश मिळविले की तो खेळाडू त्याचे आई वडील, गुरू तसेच अजून ज्यांनी कोणी त्याला मदत केली असेल त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. पण कधी असं आठवतंय का की त्या खेळाडूने त्याला योग्य अशी साथ दिल्याबद्दल त्याच्या पायांचे, श्वासाचे किंवा हातांचे आभार मानले आहेत. आता हे खेळाडू त्यांच्या त्यांच्या खेळाच्या गरजेनुसार त्या त्या अवयवांची नीट काळजी नक्कीच घेत असतील. पण जाणीवपूर्वक त्यांचे आभार मानणे हे किती जण करत असतील.  हे एक उदाहरण झाल पण खेळाडूच का आपण सर्वसामान्य माणसे देखील आपल्या अवयवांकडून किती कामे करून घेतो. पण त्याची जाणीव आपल्याला असते का? घरात एकदा समारंभ असेल आणि सगळं छान सुरळीत पार पडलं की आपण ज्यांनी ज्यांनी त्या समारंभासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानतो कौतुक करतो पण आपल्या शरीराने दिलेली साथ त्याची जाणीव असते का आपल्याला? पण तेच समजा त्या समारंभाच्या दिवशी कमरेत ऊसण भरली आणि आपल्याला काम करण अशक्य झालं तर, तर आपण सगळं खापर त्या कमरेवर फोडतो. मग असं असेल तर मनाजोगते परिणाम मिळाल्यावर त्याच थोडसं श्रेय आपल्या शरीराला देऊन त्याचे आभार मानायला नकोत का?

आपण शांतपणे बसून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या शरीराला राबवून घेत असतो. आणि आपल्या कामाच्या नियोजनामध्ये या शारीरिक अवयवांच्या दुखण्या खुपण्याने काही गडबड झाली की आपल्याला किती त्रास होतो ? पण जर का आपल्याला आपल्या शरीराची वेळोवेळी मिळणारी साथ, होणारी मदत, याची जाणीव ठेवून त्यांची नीट काळजी घेत आलो तर आपलं शरीर आपल्याला उत्तम प्रकारे आणि कदाचित जास्त काळ साथ देऊ शकेल.

या सगळ्याचा विचार केल्यावर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या काही पारंपरिक गोष्टी, आपण काही जण परंपरा किंवा पद्धत म्हणून जरी करत असलो तरी त्या मागचं मला समजलेलं logic काहीसं वेगळं आहे, बघा तुम्हाला पटतं का ते…..

  • सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा श्लोक       कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
           करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम।।
या निमित्ताने आपण आपल्या हातांचे, ज्यांनी आपल्याला दिवसभर भरपूर काम करायचं आहे, दिवस सुरू होतानाच आभार मानत असतो.

  • पूर्वीची लोकं अंघोळीच्या आधी सर्वांगाला तेल लावून छान सुगंधी उटण्याने अंघोळ करायची. अंघोळ करताना कंबर , पाठ गरम पाण्याने शेकून काढत.
ही दोन उदाहरणे, या आणि अशा अजूनही काही गोष्टी आहेत, सगळ्या इथे मांडणं शक्य नाही. पण या निमित्ताने ते आपल्या शरीराचे आभार मानत असत. त्यासाठी मुद्दाम वेळ देत असत.

आपल्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात खरतरं आपलं शरीर जास्त तंदुरुस्त असायला हवं आणि त्यासाठी आपण त्याचे थोडे लाड पण केले पाहिजेत.

आपलं शरीर हे एका लहान मुलासारखं असतं. लहान मुलं कशी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर रडून, ओरडून आपलं लक्ष वेधून घेतात! तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे. बऱ्याच वेळा असं होतं ना की सकाळी उठल्यावर एकदम हात दुखायला लागतो. करण काहीच नसतं. कधी कधी एकदम डोकं दुखायला लागतं. हं म्हणजे आता याला काहीतरी शास्त्रीय कारणं नक्की असतील पण आपलं शरीर आपल्याला आठवण करुन देत असतं की जरा माझ्याकडे पण लक्ष द्या. पण आपण इतके कठोर असतो की आपण, “जाऊ दे थांबेल थोड्या वेळाने”, अस म्हणून त्याकडे पण दुर्लक्ष करतो.  पण तेच काहीतरी मोठा आजार झाल्यावर मात्र आपण अगदी इमाने इतबारे आपल्या शरीराची काळजी घेतो. बर झाल्याबद्दल आभार मानतो. पण हीच काळजी आपण कायम घेत राहिलो तर मोठ्या आजारांची शक्यता कमी करता येऊ शकेल कदाचित.

आज जेव्हा माझ्या सासऱ्यांचे हृदयाचे ऑपरेशन चालू आहे त्या वेळेला मला हे सगळे विचार आले. मी पण आजपर्यंत माझ्या शरीराला गृहीत धरूनच सगळ्या गोष्टी करते आहे, बहुतेक जरा जास्तच करते आहे. पण आता यापुढे मात्र त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न नक्की करेन.  

आपल्या शरीराच्या कष्टांची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञता  बाळगणे हे आपले कर्तव्य आहे, असं मला वाटतं.  हे करण्यासाठी खूप काही वेगळं करावं लागतं नाही. योग्य वेळेला पोषक आणि योग्य असा आहार आपल्या शरीराला देणे. पुरेसा व्यायाम केला पाहिजे. शरीराला पुरेशी विश्रांती दिली पाहिजे म्हणजे पुरेशी झोप मिळाली पाहिजे.  या आपण नक्की करू शकतो अशा गोष्टी आहेत. आणि हे करत असताना नकळत पणे आपण आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो.

या सगळ्या लेखाचा सारांश खरतर एका वाक्यात करता येईल. आपण नेहमी असं म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला सन्मान दिला पाहिजे, मग आपलं शरीर हे तर किती महत्वाचं आहे, त्यामुळे आपल्या शरीराला पण आपण सन्मान दिला पाहिजे.

सोमवार, २ जानेवारी, २०१७

गुरुकुल


मुल साधारण २ वर्षांची झाली की आई वडिलांची शाळाशोध मोहीम सुरु होते. पूर्वी इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम असा एकाच प्रश्न असायचा. पण सध्या, कोणते बोर्ड, साधी इंग्रजी माध्यम शाळा की कॉन्व्हेंट शाळा, असे भरपूर पर्याय आहेत. आणि जेवढे पर्याय जास्त तेवढाच गोंधळ जास्त.

२००७ मध्ये माझी मुल लहान असतानाच आम्ही मुंबईहून पुण्याला आलो. आमच्यापुढेसुद्धा हाच प्रश्न होता शाळा कोणती? मुलासाठी पहिलीत प्रवेश हवा होता आणि मुलीसाठी Junior K.G. CBSE शाळेत प्रवेश घ्यायचा हे नक्की होत. त्यामुळे पर्याय आपोआपच कमी झाले. गुरुकुल या शाळेबद्दल मी खूप जणांकडून ऐकल होत, शाळा खूप चांगली आहे आणि त्याची शिक्षणाची पद्धत खूपच वेगळी आहे. याच दरम्यान मी एक पुस्तक वाचल होत, “तोत्तोचान” अस त्या पुस्तकाच नाव. या तोत्तोचानमध्ये जशी आगगाडीच्या डब्ब्यांची शाळा आहे, त्याचप्रमाणे गुरुकुलमध्ये सुद्धा आगगाडीचे डब्बे आहेत अस ऐकल होत. म्हणून म्हटल जाऊन शाळा बघून यावी.

युनिव्हर्सिटी रस्त्यावर E स्क्वेअर मॉलच्या आधी एक गल्ली आहे त्या गल्लीच्या एकदम शेवटी ही शाळा आहे. शाळेच्या आजूबाजूला शेत आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न असा परिसर आहे. पहिल्याच दिवशी मी त्या परिसराच्या प्रेमात पडले. शाळा बघायला म्हणून गेलेलो पण प्रवेश अर्ज घेऊनच घरी आलो. सदाशिव पेठेत राहत असल्याने शाळा जरा लांब आहे अस वाटल पण तो परिसर इतका मोहक होता कि त्यापुढे अंतर फार नाही वाटल.

शाळेच्या प्रवेशाच्या पद्धतीप्रमाणे आम्ही अर्ज भरून दिला मग आम्हाला interview साठी बोलावलं. इथूनच शाळेच वेगळेपण जाणवू लागल. शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. मृण्मयी भावे. यांनी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही तुम्हाला काहीच प्रश्न विचारणार नाही, आमची शाळा कशा पद्धतीने चालते याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारायचे. म्हणजे आम्हीच त्यांचा interview घेतला अस झाल. सौ. भावे यांनी आम्हाला शाळेच्या शिक्षण पद्धतीविषयी पूर्णपणे माहिती दिली. आम्ही पूर्ण शाळा बघितली, आणि शाळेत प्रवेश घेतला. दोन्ही मुलाचं शालेय जीवन सुरु झाला आणि आजही ते उत्तम प्रकारे चालू आहे. 

आज दहा वर्षांनतर जेव्हा माझा मुलगा दहावीत आहे तेव्हा मागे वळून बघताना शाळेनी आपली मुलांना काय दिल असा विचार मनात आला तेव्हा जाणवल की शिक्षणाबरोबर या शाळेनी आमच्या मुलांना खूप काही चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टी शिकविल्या ज्या त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडतील. त्यापैकी एक तर Team Spirit किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणे, आणि Healthy Competition म्हणजे स्पर्धा करा पण ती इतरांशी न करता स्वतःशी करा. आपण जेव्हा स्वतःशी स्पर्धा करतो तेव्हा आपली खरी प्रगती होते.

आपण जेव्हा इतरांशी स्पर्धा करतो तेव्हा त्यात फक्त समोरच्याला मागे कस टाकायच हे आपण बघतो आपण पुढे कस जायचा हा विचार तिथे नसतो. मुलांप्रमाणे पालकांना सुद्धा शाळेने किंवा मुलांनी शिकविले असे म्हणायला हरकत नाही की स्पर्धा ही माझी माझ्याशी आहे इतरांशी नाही. यामुळे आम्ही पालक सुद्धा मुलांना परीक्षेचे मार्क विचारताना इतरांना किती मिळाले अस विचारातच नाही फक्त आपल्या मुलाला/मुलीला किती मार्क मिळाले आणि वर्गाचा highest किती, एवढाच विचारल जातं. खरतर या दोनच प्रश्नांची उत्तर मिळतात अशी सवय आमच्या मुलांनी आम्हाला लावली आहे. आणि मला अस वाटत की हे अतिशय योग्य आहे. या मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात या गोष्टी नक्कीच उपयोगी पडतील. मला जे येतंय त्याची बढाई न मारता माझ्या बरोबरच्यांना ते जमत नसेल तर त्यांना ते कस जमेल हे बघण्यात खरी हुशारी आहे हे आमच्या मुलांना कळलेल आहे. 

प्रत्येक शाळेच काही plus काही minus असतच, पण गुरुकुल कडून मिळालेली ही शिदोरी आमच्या मुलांना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल यात शंका नाही.

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

एक वेगळा अनुभव


आपल्याला प्रवासात भरपूर वेगवेगळी लोक भेटतात. काही थोडे दिवस लक्षात राहतात काही कायमची लक्षात राहतात.
मी आणि मुक्ता दोन दिवस अमृतसरला गेलो होतो. रात्री एका ढाब्या मधून जेवून बाहेर पडलो आणि आता हॉटेलवर परत जाण्यासाठी रिक्षा बघत होतो. अमृतसरमध्ये तीन प्रकारच्या रिक्षा आहेत. एक आपली नेहमीची इंजिनवर चालणारी रिक्षा, दुसरी बॅटरीवरची रिक्षा आणि तिसरी सायकल रिक्षा. आम्ही जेवून बाहेर पडलो तेव्हा पावणे अकरा वाजले होते. मनामध्ये थोडीशी धाकधुक होती. पंजाब मधील एकदम अनोळखी शहर. रिक्षावाला कसा मिळेल काय माहित, असे काही प्रश्न मनात डोकावून गेले. इतक्यात एक बावीस तेवीस वर्षांची मुलगी आमच्या जवळ येत म्हणाली, 'ताई रिक्षा पाहिजे का, माझ्या रिक्षाने जाणार का? आम्ही काही क्षण विचार केला, तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं कि हि रिक्षा चालवत असेल. एकदम बारीक, जुने पुराणे कपडे घातलेली, थंडीने कुडकुडणारी. पण ती म्हणाली ताई चला ना माझ्या रिक्षामधून, मी तुम्हाला नीट तुमच्या हॉटेलवर सोडेन. आम्ही मनाचा निर्धार करून तिच्या रिक्षामध्य बसलो. तेवढ्या त्या १५ मिनिटांच्या प्रवासात तिने तिच्या बद्दल आम्हाला सर्व हकीकत सांगितली.
अमृतसरमध्ये ती एकमेव मुलगी आहे जी रिक्षा चालवते. सोनिया असं तिच नाव. एकदम बिनधास्त आणि प्रामाणिक मुलगी. आपण मोठ्या शहरांमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या बायका बघतो पण रिक्षा चालवणारी मुलगी आम्ही प्रथमच बघितली. पहिल्या दिवशी तिने आम्हाला सुखरूप आमच्या हॉटेलवर सोडलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा कर्मधर्म संयोगाने ती आम्हाला भेटली. पण या वेळी तिच्या रिक्षामध्ये आम्ही आणि अजून एक कुटुंब होत. तिने आता आपली सगळी कहाणी परत त्या नवीन कुटुंबाला ऐकवली. त्यांनी तिला विचारल एवढ्या रात्रीची रिक्षा चालवायला तुला भीती वाटत नाही का ग? ती म्हणाली, ती मला इथली लोक घाबरतात. लोक कितपत तिला घाबरतात ते माहित नाही पण इतर रिक्षावाले तिला मदत मात्र करत होते. ते दुसर कुटुंब जे आमच्याबरोबर होत, त्याच्या हॉटेलचा पत्ता तिला नीट माहित नव्हता, तिने एक दोन रिक्षावाल्यांना बोलावून नीट पत्ता विचारून घेतला. खरोखरच सोनिया एकदम धीराची आहे. रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ती रिक्षा चालवत असते. तेथील पोलीसही बहुतेक तिला व्यवस्थित ओळखत होते. तिने या सगळ्या लोकांना व्यवस्थित धरून ठेवले होते, अर्थातच त्यामुळे तिला हे काम करणे शक्य होते.
स्वतःच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिला हे काम कराव लागत. २०-२२ वर्षांची मुलगी पण जबाबदारीमुळे तिला केवढ मोठ बनवल. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, सोनियाला भेटल्यावर याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शिक्षक दिन


शिक्षक दिन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे माजी राष्ट्रपती, यांचा जन्मदिवस, ते स्वतः एक उत्तम शिक्षक होते आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. 

खरोखरच शिक्षक होणे काही सोपे नाही. शिक्षक मुलांना स्वतःकडील शिदोरी देऊन संपन्न करत असतो. आणि त्यासाठी त्या शिदोरी बरोबरच मुलांविषयी प्रेम आणि आत्मियता या दोन्ही गोष्टी शिक्षकाकडे असणे अतिशय गरजेचे असते.
माझ्या संस्थेच्या, नूतन बाल शिक्षण संघाच्या शाळेत मला अजूनही काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इथे शिक्षकाकडे जी शिदोरी आहे त्यात मुलांना देण्यासाठी बरेच काही आहे. मुलांविषयी प्रेम आणि आत्मियता तर आहेच आहे. पण या सर्वांच्या आधी आपल्याकडे येणाऱ्या मुलांना हि शिदोरी आत्मसात करण्यासाठी आधी सक्षम करण्याची गरज आहे, याची जाणीव आमच्या शिक्षकांना आहे.
आमच्या संस्थेच्या शाळेत येणारे विद्यार्थी समाजाच्या ज्या स्तरातून येतात तिथे शिक्षणाचे महत्त्व माहित असलेली अशी फारच कमी कुटुंब आहेत. पण मुलांमधील क्षमता या समाजातील इतर मुलांप्रमाणेच असतात. मग या क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना तयार कारणे हे खूप अवघड काम आहे. पण आमचे शिक्षक हे काम अतिशय समर्थपणे करतात.
या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींमधून हे शिक्षक विविध साधने तयार करतात आणि या साधनांमधून मुलांना शिकविले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण आणि शाळा या दोन्हीबद्दल आवड निर्माण होते. 
माझ्यामते आमच्या संस्थेच्या शाळेत येणाऱ्या मुलांना शैक्षणिक वातावरण जरी मिळत नसले तरी लहान वयात त्यांना मिळालेला जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव हा कदाचित आपल्यापेक्षा जास्त असतो. मग त्यांचे हे अनुभव जाणून घेवून त्यांना गाठीशी बांधून, त्यामध्ये शिक्षकाचे ज्ञान यांच्या एकत्र प्रयोगाने या मुलांना शिक्षण देता आले तर नक्कीच ते जास्त प्रभावशाली ठरते. आणि नेमके हेच आमच्या शिक्षकांनी जाणले. त्यामुळेच आज आमच्या शाळेतून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, सी.ए. वगैरे तर यशस्वीपणे होतातच. पण जेव्हा ते स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहतात तेव्हा पुन्हा एकदा मागे वळून शाळेत येऊन आपल्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करायला तयार असतात. 
मला अस वाटत, आमच्या सर्व शिक्षकांचे आणि संस्थेचे खरे यश यातच आहे. 
संस्थेतील सर्व शिक्षकांचे या शिक्षक दिनी मनापासून कौतुक !! 

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

आपलं घर

आपण अनेक अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमांबद्दल ऐकतो, वाचतो, कधी कधी प्रत्यक्ष बघायला जातो, त्यांना देणगी देतो. एवढाच काय तो आपला या सगळ्यांशी संबंध.

माझ्या समुपदेशन कोर्सचा एक भाग म्हणून आम्ही सर्व विद्यार्थिनी विजय फळणीकरांचा "आपल घर" हा आश्रम बघायाला गेलो. मी फक्त आश्रम अस एवढ्यासाठी म्हटलं कारण इथे वृद्ध माणसे आणि लहान मुले एकत्र राहतात. म्हणजे हा अनाथ बालवृद्धाश्रम आहे.

"आपलं घर" या नावातच आपुलकी आहे. तिथे गेल्यावर या आपलेपणाचा अनुभव सुद्धा आला. आपण स्वतःच घर जशा प्रकारे छान आणि नीटनेटके ठेवतो, शिवाय आपल्या घरातले सदस्य जसे एकमेकांशी वागतो, एकमेकांची काळजी घेतो, अगदी त्याच प्रकारे सगळं इथे बघायला मिळत.

फळणीकरांचे "आपलं घर" बघून आल्यावर फारच भारावून गेल्यासारखं वाटत, पण त्याहीपेक्षा जास्त परिणाम होतो तो त्यांचं पुस्तक 'पराजय नव्हे विजय' हे वाचल्यानंतर. यात फळणीकरांच्या बालपणापासून ते त्यांच्या आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे मांडला आहे. लहानपणापासून अनेक संकटांना समोर जात जात अतिशय धाडसी वृत्तीने आणि सकारात्मक विचारसरणीने फळणीकर अनेक दिव्यांतून गेले आहेत. पण या सगळ्या दिव्यांतून जात असताना त्यांनी त्यांची संवेदनशीलता आणि सदसद्विवेकबुद्धी कायम ठेवली.

फळणीकर दाम्पत्यावर झालेला सगळ्यात मोठा आघात म्हणजे त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे वैभव चे निधन. या आघाताने खचून गेलेल्या फळणीकरांनी यामधून बाहेर पाडण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबिला. "वैभव        ट्रस्ट" ची स्थापना करून लोकसेवेसाठी त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी एका रुग्णवाहिकेची सेवा सुरु केली. ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी त्यांनी एक ड्राइवर ठेवला परंतु तो फक्त दिवसा काम करीत असे. मग जेव्हा जेव्हा रात्री बेरात्री रुग्णवाहिकेची गरज भासत असे तेव्हा फळणीकर स्वतः ती रुग्णवाहिका घेऊन जात असत. त्यावेळी त्यांना आलेले चित्तथरारक अनुभव वाचून आपण सुन्न होतो.

त्यानंतर "आपलं घर" सुरु करत असताना त्यांना आलेल्या अडचणी त्यावर त्यांनी शोधलेले उपाय आणि त्याचप्रमाणे काही हितचिंतकांनी त्यांना सढळ हस्ते केलेली मदत ही सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकात नमूद केलेली आहे.

"आपलं घर" ची बांधणी खरच खूप छान आहे. वारजे इथे असलेला त्यांचा आश्रम हा फक्त मुलांसाठी आहे. आणि डोणजे (सिंहगड पायथा) येथे असलेली जागा बऱ्यापैकी विस्तारित आहे. येथे 10 आजी आजोबा आणि 35 मुलं मुली एकत्र राहतात. आपलं घर ही संस्था ज्या आजी आजोबांना किंवा मुलांना जवळचे असे कोणीच नाही अशांसाठी आहे. इथे राहणारे सर्व गरजू हे विनामूल्य राहतात. पण वैशिष्ट्य असे की तरीही इथले राहणीमान हे अतिशय उत्तम आहे. येथील स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे. फळणीकर म्हणतात 'हे विनामूल्य इथे राहतात म्हणून त्यांना आपल्याला कुठेतरी आणून टाकले आहे असे वाटता काम नये याची मी पूर्ण काळजी घेतो'. येथील आजी आजोबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की या लहान मुलांमुळे आम्हाला नातवंडांचं प्रेम मिळत. आम्ही त्यांची शक्य तेवढी काळजी घेतो त्याचप्रमाणे ही मुलं देखील आमची काळजी घेतात आणि आमची करमणूक करतात. आपलं घर मधील प्रत्येक मुलगा / मुलगी शाळेत जातात. या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा फळणीकरांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मोठी मुलं लहान मुलांना अभ्यासात मदत करतात.

आम्ही आपलं घर बघायला गेलो तो शनिवार होता, तेथील मंडळींकडून अस समजलं कि फळणीकर फक्त रविवारी येतात. परंतु योगायोगाने काही कामानिमित्त ते डोणज्याला आले आणि आम्ही त्यांना भेटू शकलो. अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी व्यक्तिमत्व!! त्यांच्या सांगण्यावरून त्यांचा सगळा कर्मचारी वर्ग आपलं घर ची व्यवस्था उत्तम प्रकारे बघतात. आणि ते स्वतः संस्थेसाठी देणगी मिळावी या हेतूने वेगवेगळ्या लोकांच्या भेटीसाठी फिरत असतात आणि रविवारी मात्र या त्यांच्या परिवारासोबत वेळ घालविण्यासाठी नक्की डोणज्याला येतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर " मी आणि माझी झोळी असे आम्ही आठवडाभर फिरत असतो आणि रविवारी या सर्वांसोबत वेळ घालवायला इथे येतो'.

एवढ मोठं सामाजिक काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावातील नम्रता आणि साधेपणा बघून खरोखरच कौतुक वाटत. आजपर्यंत फळणीकरांना त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु मला अस वाटत आपलं घर येथील अबलवृद्धांकडून मिळणारे आशीर्वाद आणि मुलांकडून मिळणार भरघोस प्रेम हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.

विजय फळणीकरांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या, तसेच स्वतःच्या मुलाच्या निधनाच्या दुःखाच ओझं बाळगत असताना या अनाथ मुलांवर मनापासून प्रेम करणाऱ्या साधनाताईंविषयी देखील मनापासून अभिमान वाटतो!!

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

BREAK

'फिर मिलेंगे एक छोटेसे ब्रेक के बाद' हे वाक्य आपल्या परिचयाचे आहे. पण एखादा चांगला कार्यक्रम टी. व्ही. वर चालू असताना जर ब्रेक आला तर आपल्याला आवडत नाही. अस वाटत कशासाठी इथे ब्रेक आहे ? टी. व्ही. वरील कार्यक्रमांमधे प्रयोजकांच्या जाहिराती असतात म्हणून ब्रेक असतो.
पण आपल्या आयुष्यात मात्र आपल्याला ब्रेक खूप महत्वाचा वाटतो. रोजच ठरलेल साचेबद्ध आयुष्य जगताना किंवा रोजची कामे करताना, मग ती घरातली असोत वा बाहेरची, आपल्याला दमून गेल्यासारखे वाटते. तेव्हा अस वाटत की फार नाही पण दोन एक दिवसांची तरी विश्रांती म्हणजेच ब्रेक हवा. नेहमीच्या ठरलेल्या कामांपेक्षा काहीतरी वेगळ कराव अस वाटत. अस काहीतरी ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल आणि विश्रांतीसुद्धा मिळेल. थोडक्यात, एक छोटासा का होईना ब्रेक हवा असे वाटते.
आज आई, सून, मुलगी, बायको, शिवाय घराबहेरील व्यावसायिक आयुष्यातील जबाबदारी सांभाळाताना अस वाटत की अधून मधून छोटे छोटे विरंगुळ्याचे क्षण आपल्याला मिळायला हवेत. हे क्षण आपल्याला एक वेगळीच उर्जा देऊन जातात. प्रत्येकाची विरंगुळ्याची कल्पना वेगवेगळी असु शकते. काही जणांना काहीही न करता घरात बसून विश्रांती घ्यावी अस वाटत, कोणाला खरेदी करायला, कोणाला फिरायला जावे असे वाटत असेल. जे करून आपल्याला बर वाटेल अस काहीतरी.
माझ्यासाठी विरंगुळा म्हणजे मैत्रीणिंबरोबर भरपूर भटकणे, खूप खूप गप्पा मारणे आणि मनसोक्त हसता येणे, निरागस लहान मुलाप्रमाणे वागता येणे. आपण मोठे झालो की आपल्यातले लहान मूल हरवून जाते. आपल्यातील सृजनशीलता, खेळकरपणा, कुतूहल, मनमोकळेपणा हे सगळ आपण आपल्या जबाबदार्यांमधे हरवून बसतो. आणि मोठेपणाचा मुखवटा चढवून, मोठेपणाचा आव आणून वावरत असतो. त्यामुळे असे छोटे छोटे ब्रेक मिळाले की आपण स्वतःच्या जवळ येतो आणि आपल्याला नवनवीन गोष्टी करण्याची नवीन उमेद  मिळते.
असे छोटे छोटे ब्रेक घेत जर आपण आपल्या आयुष्याची गाडी विचारपूर्वक चालवली तर नक्कीच AVERAGE चांगले मिळेल.